कृषी सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर नक्की वाचा!
कृषी सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर हा लेख वाचा आणि जास्तीत-जास्त शेअर करा. कारण यामुळे एखाद्या होतकरूच्या करिअरला दिशा मिळू शकते. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊयात….
कृषी सेवा केंद्रामध्ये शेती संबंधित कीटकनाशके, खते, बी-बियाणे उत्पादन, साठवणूक आदी बाबींविषयी विषयी तुम्ही विचार केला असेल. परंतु यासाठी आपल्याला अधिकृत परवाने काढावे लागतात.
शैक्षणिक अर्हता : बी.एस.सी., कृषी रसायनशास्त्र पदवीधर, कृषीशास्त्र विषयातील पदविका, बी.एससी. रसायनशास्त्र स्नातकोत्तर पदवीसह पीएच.डी. किंवा अभियांत्रिकी रसायनशास्त्राची पदवी ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य आहे. राज्यातील खत आणि कीटकनाशक परवानाधारकांकडे यापैकी एकही पदवी नसेल, तर दोन वर्षांच्या आत ही शैक्षणिक अर्हता प्राप्त करून घेणे आवश्यक असते.
‘या’ गोष्टी करा!
ज्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र सुरु करायचे आहे, त्या ठिकाणी गावाची लोकसंख्या किती आहे? कृषी सेवा केंद्र चालेल काय? मालाची विक्री किती होऊ शकेल? आदी बाबींचा अंदाज घ्या.
यानंतर जागा नक्की करा. ही निवड करताना जागा चौकामध्ये आहे का? त्या जागेवर ग्राहकाची ये-जा होत असते का? माल वाहतुकीचे वाहन तत्सम जागेवर ये-जा करू शकते का? याचा देखील विचार करा.
जर तुम्ही खते व औषधे दोन्ही विक्री करणार असाल तर दोन्हीचा परवाना वेगवेगळा घ्यावा लागतो. जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाचीही परवानगी देखील आवश्यक आहे.
मग अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरा. त्यानंतर पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रांचा तीन प्रतीमध्ये संच तयार करा. (एक कॉपी मूळ प्रत, एक कॉपी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करा आणि एक आपल्याकडे ठेवा.)
आवश्यक कागदपत्रे :
● पॅन कार्ड
● आधार कार्ड
● पासबुक झेरॉक्स
● लाईटबिल
● शैक्षणिक अर्हतेचे मार्क मेमो/ टी.सी.
● ऑनलाईन भरलेला फॉर्म
● पैसे भरल्याची पावती/ चलन
● कृषी अधिकाऱ्यांचा जागा पाहणीचा दाखला
● जागेचा नकाशा
● व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामपंचायत/ म.न.पा./न.पा.)
● नमुना न. 8 (ग्रामपंचायत/ म.न.पा./ न.पा.)
● जर जागा भाड्याने असेल तर भाडे करार पत्र
दरवर्षी परवाना नूतनीकरण करतेवेळी परवानाधारकांना शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. किमान दोन वर्षांतून एकदा पायाभूत सुविधा, उत्पादन स्थळ, साठवणूक स्थळ व अभिलेखाची तपासणी अनिवार्य आहे. तसेच कीटकनाशकाचा उत्पादन परवाना तात्पुरती नोंदणी संपुष्टात येईल त्याच दिवशी कालबाह्य होत असतो.
🌾 शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : 👉 https://instabio.cc/krushidootgroup