बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत
बोर्डो मिश्रण बाजारामध्ये तयार स्वरूपात उपलब्ध आहे; परंतु ते शेतकऱ्यांनी स्वतः तयार केल्यास याचा खर्च बाजारातील तयार बोर्डो मिश्रणापेक्षा कमी होतो. तसेच, आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात तीव्रतेचे मिश्रण तयार करू शकतो. बोर्डो मिश्रण तयार करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण यामधील मोरचुदाचे प्रमाण जास्त झाल्यास मिश्रण आम्लधर्मी होऊन त्याचा वाईट परिणाम पिकावर होण्याची शक्यता असते.
बोर्डो मिश्रणासाठी लागणारे घटक :
१) निळे स्फटीकमय मोरचूद २) कळीचा चुना ३) पाणी
वरील घटकांचे प्रमाण किती असावे. हे मिश्रणाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. म्हणून वेगवेगळ्या तीव्रतेचे मिश्रण तयार करण्यासाठी लागणारे वरील घटकांचे प्रमाण खालील तक्त्यामध्ये दिलेले आहे.
बोर्डो मिश्रण करण्याची पद्धत :
१. प्रथम १ किलो बारीक केलेले मोरचूद ५० लिटर पाण्यामध्ये विरघळण्यासाठी रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या भांड्यामध्ये ५० लिटर पाणी घेऊन त्यात १ किलो कळीचा चुना विरघळण्यासाठी ठेवावा
२. दोन्ही द्रावणे ठराविक कालांतराने सतत पळून घ्यावीत. दोन्ही घटक (मोरचूद व चुना) पूर्णपणे विरघळण्यासाठी खात्री झाल्यानंतर दोन्ही द्रावणे हळूहळू तिसऱ्या भांड्यामध्ये एकाचवेळी ओतावी, ओतत असताना ढवळण्याची क्रिया सुरूच ठेवावी.
३. दोन्ही द्रावणे पूर्णपणे मिसळल्यानंतर भांड्यामध्ये फिकट निळ्या किंवा आकाशी रंगाचे जे द्रावण तयार झालेले दिसेल ते बोर्डो मिश्रण.
वापरण्यापूर्वी चाचणी :
वरीलप्रमाणे तयार केलेले बोर्डो मिश्रण वापरण्यापूर्वी त्याची योग्यतेची चाचणी करणे फार महत्त्वाचे आहे. ही चाचणी शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये मिश्रण तयार केल्यानंतर सहजरीत्या करू शकतात. त्यासाठी लोखंडी खिळ्याचा किंवा विळ्याचा वापर करू शकतो. तयार केलेल्या मिश्रणामध्ये लोखंडी खिळा किंवा लोखंडी विळ्याचे पाते अर्धा ते १ मिनीट बुडवून ठेवावे, बाहेर काढल्यानंतर लालसर रंगाचा थर लोखंडी भागावर जमा झालेला दिसल्यास तयार केलेले मिश्रण आम्लयुक्त आहे, असे समजावे. त्यामुळे त्या द्रावणामध्ये आणखी थोडा कळीचा चुना मिसळावा. मिश्रण ढवळून परत त्याची चाचणी करावी. परत चाचणी केल्यानंतर लोखंडी भागावर लालसर थर दिसून न आल्यास तयार केलेले मिश्रण फवारणी करण्यास योग्य आहे. असे समजावे.
घ्यावयाची काळजी :
१.मिश्रण तयार करताना नेहमी प्लॅस्टिक किंवा लाकडाच्या भांडयाचा वापर करावा, कारण धातूच्या भांड्यामध्ये मोरचुदाची रासायनिक क्रिया होऊन मिश्रणाचे मूळ गुणधर्म बदलण्याची शक्यता असते.
२. मिश्रण तयार केल्यानंतर लगेचच म्हणजे २४ तासांच्या आत वापर करावा. जास्त काळ साठवून ठेवलेले मिश्रण हे वापरण्यास योग्य नसते.
३. मिश्रण तयार करताना दोन्ही घटक (मोरचूद व कळीचा जुना) पूर्णपणे विरघळल्याची खात्री करावी. तसेच मिसळताना दोन्ही द्रावणे थंड असावीत.
अशाप्रकारे आपण कमी खर्चात बोर्डो मिश्रण स्वत:च्या शेतात तयार करून सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी त्याचा वापर करू शकतो
प्रा. सचिन खाटीक
सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोग शास्त्र विभाग,
कृषी महाविद्यालय, सोनई