हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवतात? जाणून घ्या!
हमीभावाच्या मुद्द्याची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. मात्र अनेकांना याबाबत फारसे माहिती नसते. खास त्या लोकांसाठी हमीभाव म्हणजे काय? तो कोण ठरवतो? तो कसा ठरवतात? याबाबत माहिती पाहूयात…
हमीभाव म्हणजे काय? : किमान आधारभूत किंमत (MSP म्हणजेच Minimum Support Price) असे म्हणतात. ही एक प्रणाली असून यातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देते.
सध्या याअंतर्गत सरकार एकूण 23 शेतमालांची खरेदी करते. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा तीळ आणि कापूस आदींचा समावेश होतो. हमीभावाचा उद्देश म्हणजे बाजारात शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तर तेव्हा केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाईल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल.
हमीभाव कोण ठरवते? : कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अॅण्ड प्रायझेस (CACP)च्या आकडेवारीवरून भारत सरकारचे कृषी मंत्रालय हमीभाव ठरवत असते. एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसारखा असतो.
हमीभाव नक्की कसा ठरवतात? : केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं उत्पादन खर्च निश्चित करण्यासाठी तीन सूत्रं निश्चित केली आहेत.
● ए-2 : हे पहिले सूत्र असून यानुसार बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो.
● ए-2+एफ एल : हे दुसरे सूत्र असून यात शेतकरी आणि त्याच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते.
● C-2 : हे तिसरं सूत्र असून यानुसार बियाणे, खते, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचं भाडं निश्चित करून त्याआधारे उत्पादन खर्च ठरवला जातो.
दीडपट हमीभाव म्हणजे नक्की काय? : एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या पन्नास टक्के नफा, इतका हमीभाव सरकार देणार असा त्याचा अर्थ आहे. उदाहरणार्थ, 10,000 हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर 15,000 रुपये हमीभाव सरकार देणार.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup