IND vs BAN : बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाची 4 कारणे, कोण आहे व्हिलन?
IND vs BAN सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका गमावली. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 271 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात टीम इंडिया लक्ष्यापासून 5 धावा दूर राहिली. भारताने निर्धारित 50 षटकात 266 धावा केल्या. आता प्रश्न असा आहे की, भारतासारख्या बलाढ्य संघाने बांगलादेशकडून एकदिवसीय मालिका कशी गमावली? याची चार मोठी कारणे पाहूयात…
बॅटिंग फ्लॉप : टीम इंडियाची मजबूत बाजू ही तिची फलंदाजी मानली जाते, परंतु वनडे मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचे फलंदाज कामी आले नाहीत. विराट कोहली, शिखर धवन यांनी दोन्ही सामन्यात धावा केल्या नाहीत. पहिल्या सामन्यात केएल राहुलने धावा केल्या मात्र दुसऱ्या सामन्यात तो निराशाजनक फलंदाजीनंतर बाद झाला. त्यामुळेच संघात एवढे मोठे फलंदाज असूनही बांगलादेशकडून मालिका गमवावी लागली.
हेही वाचा : गहू, हरभऱ्याचा पीकविमा भरण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत
गोलंदाजांनी सामना हाताबाहेर जाऊ दिला : टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही आपल्या कामगिरीने निराशा केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजयाची संधी होती पण त्यांना बांगलादेशची शेवटची विकेट काढता आली नाही. अखेरच्या विकेटसाठी मुस्तफिझूर आणि मेहदी हसन मिराज यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यातही तसेच झाले. एकेकाळी बांगलादेशने अवघ्या 69 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या पण नंतर गोलंदाजांनी त्यांना पुनरागमनाची संधी दिली आणि बांगलादेशने 271 धावा केल्या.
खराब क्षेत्ररक्षण : वनडे मालिकेतही टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते. विशेषत: पहिल्या सामन्यात केएल राहुलने ज्या प्रकारे सोपा झेल चुकवला आणि वॉशिंग्टन सुंदरने मिराजचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही, ते संघाला महागात पडले. हे झेल पकडले असते तर कदाचित संघ जिंकला असता.
खराब व्यवस्थापन : टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे कर्णधार आणि त्याचे खराब व्यवस्थापन. संघ कोणत्या विचारसरणीखाली मैदानात उतरतोय हे कळत नाही. फुल फॉर्मच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येत असून आउट ऑफ फॉर्म खेळाडूंना सतत संधी मिळत आहे. यासोबतच रोहित शर्माचे कर्णधारपदही सरासरी दिसत आहे. यामुळेच 2015 नंतर पुन्हा एकदा टीम इंडियाने बांगलादेशमध्ये वनडे मालिका गमावली.