….म्हणून कृषी क्षेत्रातील चमत्कारासाठी जगभर ‘इस्राईल’ ओळखला जातो!
अवघ्या 75 लाख लोकसंख्येचा देश इस्राईल आज आपल्या कृषी क्षेत्रातील चमत्कारासाठी जगभर ओळखला जातो. या देशाबद्दल सांगायचे झाले तर या देशाचा अर्ध्याहून अधिक भाग वाळवंटाने व्यापला असून पावसाचे प्रमाण देखील नगण्य आहे. या देशात एकही मोठी नदी नाही. आता तुम्ही म्हणाल, एवढी प्रतिकूलता असताना या देशाने नक्की काय केले? चला तर आज या लेखात याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
इस्राईलची लोकसंख्या गेल्या 63 वर्षांत 12 पट वाढली मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचं घटले असून ते 60% हून खाली येत 3% आले आहे. असे असले तरी इस्राईल अन्नधान्याच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्ण आहे. ते मोठ्या प्रमाणावर कृषीमालाची निर्यात करतात. त्यामुळेच त्यांना युरोपचे हरितगृह म्हणून देखील संबोधले जाते.
इस्राईललने ठिबक सिंचन, हरितगृह, वाळवंटातील मत्स्यशेती, खतं, बियाणं अशा अनेक क्षेत्रात क्रांतीकारी संशोधन केले आहे. दुग्धोत्पादनात तर इस्राईल जगात प्रथम क्रमांकावर आहे. येथे शेती आता शेती-तंत्रज्ञान बनली आहे. यासाठी इस्राईली लोकांचे अविरत कष्ट, धडपडी वृत्ती, प्रयोगशीलता व उद्योजकता कारणीभूत आहे बरं का.
इस्राईलच्या भूमीची 20 व्या शतकाच्या सुरूवातीस अत्यंत विदारक होती. शेतीयोग्य जमिनी असो कि पाणी दुर्भिक्ष्यचं होतं. बहुतांशी ज्यू लोकांना शेतीचा अनुभव देखील नव्हता. त्यामुळे त्यांनी शून्यापासून सुरूवात करत पराकोटीच्या अडचणींना तोंड जगात जगात आपली एक वेगळं ओळख निर्माण केली आहे.
1909 साली सुरूवात झालेली किब्बुत्झ चळवळ अल्पावधीत सर्वत्र पसरली आहे. किब्बुत्झचं वैशिष्ट्यं म्हणजे पराकोटीचा सहकार. येथे व्यक्तीवादाला अजिबात स्थान नव्हतं. मुलांनी शाळेनंतर कोणतं शिक्षण घ्यायचं? याचा निर्णय ग्रामसभेद्वारे नक्की व्हायचा. जे काही आहे ते समाजाचे अशी दृढ भावना त्या लोकांमध्ये होती. भविष्यात व्यक्तीवादाला महत्त्व प्राप्त झाले आणि किब्बुत्झ चळवळ ओसरली. कालांतराने त्यात अनेक बदल झाले. पण किब्बुत्झ चळवळीने खऱ्या अर्थाने इस्राईलच्या शेतीचा पाया रचला.
तत्कालीन लोकांनी प्रचंड कष्ट करून उत्तरेकडील दलदलीची जमीन लागवडी योग्य बनवली. जमीन, वातावरणाचा अभ्यास करून नवनवीन प्रयोग केले, कृषी तंत्रज्ञान विकसित केलं. तसेच दक्षिणेकडील वाळवंटी भागात जाऊन वसाहती उभारल्या. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत वाळवंटी शेती तंत्रज्ञान विकसित केलं. एकेकाळी शेजारील राष्ट्रांनी इस्राईलशी शत्रुत्त्व पुकारले त्यामुळे त्यांना अन्न-धान्याच्या आयातीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. मग या लोकांनी जिद्दीने नैसर्गिक आणि राजकीय समस्यांवर उत्तर शोधून काढले.
येथील 65% कोरडवाहू जमीन दक्षिणेकडे तर गोड्या पाण्याचे 80% स्रोत उत्तरेकडे आहेत. त्या समस्येवर उपाय म्हणून इस्राईलने महत्त्वकांक्षी राष्ट्रीय जलजोडणी योजना राबविली. याद्वारे इस्राईलच्या उत्तरेकडील पाणी पाईपलाईनद्वारे सुमारे 400 कि.मी. दक्षिणेकडे आणले. त्याचबरोबर जमिनीखालच्या पाण्याचे रिचार्जिंग करणे, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी बनवणे, सांडपाण्याचं शुद्धीकरण असे विविध उपाय त्यांनी केले. समुद्राचे पाणी गोडे बनविण्याचा जगातील सर्वात मोठे प्रकल्प अश्कलॉन व हदेरा येथे आहे.
आजघडीला इस्राईल त्यांच्याकडे उपलब्ध पाण्याच्या सुमारे 80% पाण्यावर पुनर्प्रक्रीया करते. गोड्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तर सांडपाणी पेयजलाएवढे शुद्ध करून ते शेतीसाठी वापरले जाते. इस्राईलने 1958 साली ठिबक सिंचन पद्धतीचा शोध लावला. आज येथील जवळपास सर्व शेती ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून होते.
सध्या ‘ठिबक’ मधून शेतीला खतपुरवठा केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्राईलमध्ये पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. त्याचे व्यवस्थापन व वितरण ही सरकारची जबाबदारी आहे. दरवर्षी किती पाऊस पडणार? पाण्याचा किती साठा शिल्लक आहे? यावरून शेतीला किती पाणी पुरवठा करायचा याचा निर्णय घेतला जाते. येथे पाण्याचे मीटर बसवणं सक्तीचे असल्यामुळे कोणालाही पाणी फुकट मिळत नाही.
अशी होते किफायतशीर शेती : इस्राईलमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबातून अधिकाधिक उत्पन्न देणार्या पिकांची लागवड करतात. इस्राईलमधील जाफा संत्री जगभर प्रसिद्ध असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असल्याने त्यांची मर्यादित लागवड होते. तसेच फळं, फुलं आणि भाज्यांची लागवड करून त्याची युरोपीय बाजारात निर्यात करण्यात येते. क्षारयुक्त पाण्यावर उगवणारी पिकं विशेषकरून घेतली जातात. जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून बियाण्याचा कमीत-कमी वापर होईल तसेच शेल्फ लाईफमध्ये वाढ होईल याकडे लक्ष दिले जाते.
हो, दुधामधाचा देश : 20 व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात इस्राईलमध्ये दुधाचं उत्पादन नगण्य होते. मग त्यांनी युरोपातील दुधाळ गायींचे अरबस्थानातील उष्णतेत चांगले दुध देणार्या गाईंशी संकर केले. यातून इस्राईली गाईंच्या सर्वोत्तम प्रजाती तयार केल्या. आज येथे प्रत्येक दुध देणार्या जनावरांचा रेकार्ड ठेवला जातो. गोठ्यांमधील तापमान नियंत्रित केले जाते. गाईच्या आरोग्याचे मापन केले जाते. यासाठी गाईच्या गळ्याला कॉलर बांधून किंवा तिच्या पोटात इलेक्ट्रॉनिक चिप सोडले जाते. येथे गाईच्या मोकळ्या जागेत चरण्यावर प्रतिबंध आहे. यंत्राद्वारे गाईचा आहार तयार केला जातो.
शेळ्यांच्या जाती विकसित : जर्मन आणि अरबस्थानातील शेळ्यांच्या संकरातून हंगामी 550/700 लिटर दूध आणि 2 पिल्लांना जन्म देणार्या शेळ्यांच्या जाती त्यांनी विकसित केल्या आहेत. शेळीच्या दूधाच्या चीजला विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यातून शेतकर्यांना चांगला पैसा मिळतो. तसेच कुक्कुटपालन व मधमाशीपालनात इस्राईलने प्राविण्य संपादन केले आहे.
प्रति शेतकरी उत्पादनात वाढ : इस्राईलने हायटेक क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त केल्याने त्यांना शेतीसाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी त्यांनी यांत्रिकी शेतीवर भर दिला आहे. यामुळे प्रति शेतकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ जप्त आहे. आजघडीला इस्राईली शेतकरी 100 माणसांची अन्नाची गरज भागवतो. त्यांचे एकूण कृषी उत्पन्न 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या कृषीमालाची निर्यात केली जाते. आपल्या गरजेच्या 70% कृषी उत्पन्न इस्राईलमध्ये पिकते. तसेच इतर गोष्टींची आयात देखील केली जाते.
कृषी तंत्रज्ञानाची निर्यात : आज इस्राईल मोठ्या प्रमाणावर कृषी तंत्रज्ञानाची निर्यात देखील करतो. नेटाफिम ही इस्राईली ठिबक सिंचन कंपनी आज जगातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि भारत त्यांच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. इस्राईल दुग्धोत्पादन तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धतीने गोठ्यांची बांधणी, पॉलीहाऊसेस आणि ग्रीन हाऊस उभारणी, प्लॅस्टिकल्चर, उत्तम जातीचे बी-बियाणे, कृषीसाठी संगणकीय यंत्रणा निर्यात करतो. इस्राईली शेतकरी किती प्रगत आहे याचे उदाहरण म्हणजे आज येथील शेतकरी मोबाईल फोनद्वारे एका अॅप्लिकेशनचा वापर करून इंटरनेटद्वारे जगात कोठूनही आपल्या शेतीला पाणी देऊ शकतो. हवामानाचा अचूक अंदाज, बाजारभाव व कृषी सल्ला देखील मिळवू शकतो.
इस्राईलच्या यशाचे गमक म्हणजे कृषी उद्योगातील विविध क्षेत्र आणि स्तरावरील उत्तम सहकार्य. येथे कृषी संशोधन संस्था, प्रशिक्षण संस्था, एक्सटेंशन संस्था व शेतकरी एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. शेतकरी संशोधन संस्थेत जाऊन नवीन तंत्रज्ञान शिकून किंवा विकत घेऊन त्याचा आपल्या शेतात अवलंबन करण्याचा प्रयत्न करतो. तसेच कृषी संबंधित माहितीची संगणकीय नोंद असल्याकारणाने दुष्काळी परिस्थिती किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला असता शासनाला तातडीने उपाययोजना करणे शक्य होते.
भारत आणि इस्राईलमध्ये काही गोष्टी समान असल्या तरी कृषी आणि कृषीतील स्वयंपूर्णता ही दोन्ही देशांसाठी आणि परस्पर संबंधातील पाठीचा कणा आहे. इस्राईलने परिस्थितीशी झुंज देऊन कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या वेगवान कृषी विकास आणि सर्वसमावेशक कृषी विकास ही भारतासमोरील आव्हानं कायम आहेत. त्यामुळे इस्राईल लोकांनी केलेली मेहनत आणि अपार कष्ट करण्याची गरज आहे. अडचणी येत राहणार त्यातून मार्ग काढून पुढे जाते राहिले पाहिजे.
———————————————————–
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/
———————————————————–