Statewide Agitation : ….अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करु; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सरकारला इशारा
राज्य सरकारकडून मागील काही महिन्यापूर्वी 75 हजार पदांसाठी नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र आजवर सरकारकडून प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे 75 हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच जर या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात भरती प्रक्रिया सुरु झाली नाही, किंवा जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आता राज्य सरकारला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात पोलीस शिपाई भरतीच्या घोषणेनंतर वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेल्या नाहीत. तर महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. 75 हजार पदभरतीची घोषणा करुन तीन ते चार महिने उलटून गेले. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होत नाही. या विरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर सुद्धा आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरु केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात एकतर सरळसेवा भरती होत नाही आणि थोड्या प्रमाणात झाली तर ती पारदर्शक होत नाही नुसते घोटाळे होत आहे. हे सरकार विद्यार्थ्यांच्या संयमाशी खेळत आहेत. काल आम्ही ट्विटर वॉर केलं. आता आम्ही सरकारला इशारा देत आहोत की, लवकरात लवकर जर तुम्ही भरती सुरु केली नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करु. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय दिसत नाही. अभ्यास न करता आता आम्हाला आमच्या हक्कासाठी, भविष्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर सरळ सेवा भरती सुरु करा. तुम्ही दिलेलं 75 हजार पदांच्या नोकरभरतीचं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा, असं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले.