Maharashtra Unseasonal Rain : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा; नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार
हवामान विभागानं येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. वादळी वाऱ्यानं केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे.
निसर्गानं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र या शेतकऱ्यांनी चिंता करू नये. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. असं अश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं ते माध्यमांशी बोलत होते.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.