पीक नुकसान मोजण्याचे नेमकं ‘एकक’ काय? वाचा!
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि तातडीची मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र पीक नुकसानीचे प्रमाण ठरिवण्याचे एकक काय? त्याचा वापर होतो का? हे पाहणे महत्वाचे आहे. चला, तर आज पंचनाम्याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पिकाची काढणी केल्याशिवाय नक्की नुकसान किती झाले आहे? हे समजत नाही. त्यासाठी सरकारने एक पध्दती ठरवून दिली आहे. त्यानुसारच पीकाचे पंचनामे होणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या नियमानुसार पिकाच्या क्षेत्रातील 1 बाय 1 मीटर वरील पिकाची काढणी करावी लागते.
समजा उडीद पीकाचे नुकसान झाले आहे तर, उडीद शेतातील 1 बाय 1 मीटर क्षेत्रावरील उडिदाची काढणी करायची. त्यानंतर काढणीला आलेल्या अवस्थेतील शेंगाचे किती नुकसान झाले? त्याची मोजणी केली जाते. त्यानुसार 1 बाय 1 मीटर मध्ये एवढे नुकसान तर एका हेक्टरात किती नुकसान? हे असे ठरवावे लागत आहे. थोडक्यात काय तर 1 बाय 1 मीटर मध्ये झालेल्या नुकसानीची टक्केवारी उर्वरीत क्षेत्रासाठी लागू असते.
विमा कंपनी काय करते? : सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचलेलेच आहे. त्या पाण्यात जाऊन शेतकऱ्यांनी पंचनामे व्हावेत याकरिता दावे केले आहेत. मात्र, विमा कंपनीचे प्रतिनीधी नियमानुसार नुकसानीची टक्केवारी ठरवत नाहीत. बांधावरुनच अंदाजे नुकसान ठरवले जाते. याचमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
पंचनाम्याची प्रक्रीया कशी असते? :
● सर्वप्रथम शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची रीतसर तक्रार द्यावी लागते.
● त्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतात.
● पुढे शेतकऱ्याच्या पिकाच्या नोंदीनुसार पंचनामे होतात.
● दरम्यान प्रत्येक एकरावरची पाहणी न करता नुकसान झालेल्या पिकाचे निकष गटाकरीता लागू केले जातात.
मदतीची रक्कम नक्की कशी ठरते? :
● पिकाच्या नोंदणीनुसार जर 33 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान तर त्या पीक नुकसान भरपाईस शेतकरी पात्र होतात.
● कोरडवाहू, बागायत करीता वेगवेगळे निकष आहेत.
● कोरडवाहू क्षेत्राचे नुकसान झाले तर हेक्टरी 9 हजार रुपये हे दिले जातात. ही रक्कम केंद्र सरकार देऊ करते. यामध्ये राज्य सरकारही मदत करते.
● बागायत क्षेत्रासाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदतीचे निकष आहेत.
● दरम्यान नैसर्गिक आपत्ती विभागाकडे नुकसानीचे अहवाल पाठविले जातात.