सोलापुरातील पठ्याने लाल केळीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग, नक्की कसं मिळालं यश?
लाल केळी म्हटलं की कर्नाटक तामिळनाडूची आठवण येते. कारण या राज्यांमध्ये अशाच केळींचे उत्पादन घेतले जाते. मात्र आता लाल केळीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग महाराष्ट्रातील सोलापुरात झालाय. करमाळा येथील अभिजित पाटील या सिव्हिल इंजिनिअर असलेल्या तरुणाने हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. सध्या तो यातून चांगला नफा देखील कमावतो आहे.
उजनी जलाशयाच्या काठावर अभिजीतची शेती आहे. त्या ठिकाणी पूर्वापार ऊसाचे पीक घेतले जात होते. मात्र ऊसासोबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता अभिजितच्या वडिलांनी 2005 मध्ये पहिल्यांदा या भागात G9 या नेहमीच्या केळीची लागवड केली. पुढे लाल केळींचे कधी दर 20 रुपये तर कधी 2 रुपये असे बदलत असल्याने कधी फायदा तर कधी तोटा होऊ लागला. यानंतर अभिजीतने पहिल्यांदा 2015 साली वेलची केळी लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्याने 7 एकरवर लागवड केली.
गीर गायीचे शेण, गोमूत्र आणि ऊसाच्या मळीची स्लरी देत त्याने याची जोपासना केली. दहाव्या महिन्यात अभिजीतला एकरी 12 ते 15 टन इलायची केळीचे 50 रुपये किलोप्रमाणे लाखोंचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर एका ठिकाणी विक्रीस आणलेली लाल केळी पहिली. याला सुपर मार्केटमध्ये प्रतिकिलो 120 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे या केळीची लागवड करण्याचे ठरविले. त्यानुसार 2019 मध्ये अभिजीतने शेतात 3 एकरावर पहिल्यांदाच लाल केळीची लागवड केली.
हेही वाचा : आता सरकार मिटवणार जमिनीवरून होणारे भाऊबंदकीतील वाद; ‘ही’ सरकारी योजना करेल यासाठी मदत
रासायनिक खते आणि औषधांना फाटा देत संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जोपासना केल्याने 14 महिन्यात एकरी 18 ते 20 टन एवढा माल मिळाला. या केळींना देखील प्रतिकिलो 50 ते 75 प्रमाणे भाव मिळत असल्याने महाराष्ट्रात केलेला हे दोन्ही प्रयोग यशस्वी ठरले. लाल केळीची झाडे 15 ते 20 फुटांपर्यंत वाढत जातात. त्यामुळे सुरुवातीला अभिजीतलाही हे थोडे त्रासदायक वाटले. शिवाय या केळीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात पिल्ले येत असल्याने बाकीची पिल्ले वेळीच तोडण्याची खबरदारी घ्यावी लागल्याचे अभिजीतचे वडील बाळासाहेब पाटील सांगतात.
सध्या अभिजीतचे पाहून वाशिंबे परिसरात 500 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर ही वेलची केळी आणि रेड बनाना लागवड झाली आहे. आता हे वाशिंबे वेलची केळी आणि रेड बनानाचे हब बनू लागले आहे. ही केळी पाहण्यासाठी सध्या जळगाव, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध भागातून शेतकरी येत असून जवळपास 70 लाख बेण्यांची विक्री झाली आहे.
अभिजित आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या शेतात इतरही फळांची लागवड करतात गोल्डन सीताफळ, व्हाईट आणि रेड ड्रॅगन फ्रुट अशा फळांची लागवड देखील त्याने आपल्या शेतात केली आहे. सध्या अभिजीत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल बनला असून राज्यभरातून रोज शेकडो शेतकरी त्याची शेती पाहण्यासाठी येत आहेत.