राज्यात सर्वप्रथम बीटी कापूस लावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा वाचाच!
विदर्भाचे नाव घेताच शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने डोळ्यासमोर उभी राहिलीच म्हणून समजा. मात्र काही
शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखूनशेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिली. अशाच काही निवडक शेतकऱ्यांच्या यादीत अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील चितळवाडीचे प्रगतशील शेतकरी विजय इंगळे पाटील यांचे नाव घ्यावेच लागेल.
आधुनिक तंत्र, काटेकोर पाणी व्यवस्थापन, पीकपद्धत बदल, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिकतेची सांगड घालत कमी पाण्यातही शेती यशस्वी आणि समृद्ध कशी करावी? याचा आदर्श विजय इंगळे पाटील यांनी घालून दिला आहे.
अकोला जिल्ह्याची परिस्थिती पाहता आहे त्या त्यापेक्षा वेगळे काहीतरी करता आले पाहिजे याविषयी विजय इंगळे यांनी विचार सुरु केले. त्यांची शेतीसाठी सुरु असणारी धडपड १९७०च्या दशकापासून पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली.
इतिहासात नोंद : १९९७-९८च्या दरम्यान बीटी कापसाचे वारे सुरू होते. अशा स्थितीत नवतंत्रज्ञानाला सामोरे जायचा निर्णय विजय इंगळे यांनी घेतला आणि भारतातील बीटी कापसाची पेरणी करणारा पहिला शेतकरी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. पुढे पारंपरिक कपाशीच्या अडीच ते तीन क्विंटल उत्पादनाच्या तुलनेत एकरी १० ते १२ क्विंटल कापूस इंगळेंच्या हातात आला.
पाण्याच्या बचतीसह घेतले अधिक उत्पादन : दरम्यान मोकाट पाण्याने शेतजमिनीचा कस खालावण्यासह कापसालाही याचा फटका बसत होता. यात त्यांना बदल करायचा होता. मग पाण्याच्या बचतीसह अधिक उत्पादन घ्यायचे कसे? या शोधात त्यांनी जैन ठिबक बसवले. २००१ मध्ये ठिबकच्या पहिल्याच वर्षी एकरी पंचवीस क्विंटल कापूस घेऊन त्यांनी विक्रमी नोंद केली. आता हाच कापूस ते ठिबकच्या सहाय्याने साडेअठ्ठावीस क्विंटल एकरी घेतात. यंदा पावसाचा फटका बसूनही त्यांचे कापसाचे उत्पादन एकरी २४ क्विंटल झाले आहे!
पशुधनाला दिला आकार : इंगळेंना शेतीतील आधुनिकताच जपत शेतीला पुरक उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशुधनाला आकार देण्यासाठी प्रयत्न सुरु केली. त्यासाठी पशुपालनाचा अभ्यास करून अत्याधुनिक गोठा उभारला. शेतातील चाऱ्याचा आधार जनावरांना, तर जनावरांच्या शेणखताचा आधार शेतीला असे गणित त्यांनी बसविले. त्यांनी आता दूग्धोत्पादनाबरोबरच जनावरांच्या शेण आणि गोमूत्रापासून बायोगॅस प्लँट उभारलाय. बायोगॅसप्लँटवर वीज निर्मिती होत असून त्यांच्या घरात या पर्यावरणपूरक वीजेचा वापर होतो आहे.
केळीचे यशस्वी उत्पादन : इंगळेंनी २००४-०५ मध्ये जैन टिश्यू कल्चर केळी लावण्याचा निर्णय घेतला. स्थानिक उष्णतेची परवा न करता त्यांनी केळी लागवड करण्याचा निर्णय घेतला. तसेच केळीचे यशस्वी उत्पादन घेऊनही दाखविले. आजघडीला त्यांच्याकडे २२ हजार टिश्यूकल्चर केळी आहे.
पाणीप्रश्नही लावला मार्गी : इंगळेंनी शेतावर जलसंधारणाच्या उपायातून पाणीप्रश्नही सोडविला. पावसाचा प्रत्येक साठविता यावा म्हणून शेतात शेततळे बांधले. पिकांना थेंबा-थेंबाने आवश्यक तेवढेच पाणी द्यायचे हा आधुनिक काटेकोर शेतीचा मंत्र त्यांनी यशस्वीपणे अंगिकारला आहे. हेच त्यांच्या शेतीतील यशाचेही रहस्य आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup