शेळीपालन करताय? मग असे मिळवा अनुदान…!
बळीराजाच्या जोड उद्योग अर्थात शेळी, कुक्कुटपालनला बळकटी मिळावी यासाठी राज्य सरकार आता अनुदान देणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने “शरद पर ग्रामसमृद्धी’ योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने चांगला फायदा होऊ शकेल. दरम्यान या योजनेचे स्वरूप काय? अर्ज कसा व कुठे करावा? याबाबत सविस्तर माहिती पाहूयात…
शेळीपालन शेड बांधकाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार :
● 10 शेळ्यांकरिता शेड बांधकाम : 49,284 रुपये अनुदान
● 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
● जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा? :
● तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
● अगोदर तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.
● त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.
● अर्जदारानी आपली माहिती भरावी. जसे कि नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक.
● ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
● आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने शेळी पालन शेड अनुदान हवे असल्याने या पर्याया समोर बरोबरची खूण करा.
● या ठिकाणी प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
● तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा.
● जो प्रकार तुम्ही निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.
● लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.
● रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.
● अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
● सर्वात शेवटी घोषणापत्रावर तुमचे नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
● मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.
● ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगण्यात येईल.
● या सर्व प्रक्रियेनंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल व तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही ते नमूद केले जाईल.
● मनरेगाचे लाभार्थी असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल; मात्र तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल.
आपल्याला सदर योजनेबाबतची माहिती आवडल्यास ही योजना तुमच्या मित्रांना व शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.