‘या’ राज्यांत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर!
गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे तसेच शिक्षणातून विकास साधण्यासाठी कर्नाटक सरकारने महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. यासाठी कर्नाटक सरकारने तब्बल एक हजार कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद केली आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नोंदणीकृत शिक्षण संस्था आणि विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
नक्की काय आहे योजना? :
● शासकीय आदेशानुसार, आयटीआय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २५०० आणि विद्यार्थीनींना ३००० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे
● बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, एमबीबीएस, बीई आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ५००० आणि विद्यार्थीनींना ५५०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.
● कायदा, पॅरामेडिकल स्टडीज,नर्सिंग आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५०० आणि विद्यार्थीनींना रु. ७५०० रुपये मिळतील.
● पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थीनींना अनुक्रमे १०,००० आणि ११००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
● शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना अन्य स्त्रोतांकडून शिष्यवृत्ती प्राप्त होत असेल तर मात्र राज्य सरकारच्या या योजनेसाठी आपण पात्र ठरणार नाही. विशिष्ट अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाणार आहे.
या योजनेची सुरुवात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने करण्यात आली आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup