अनोखा प्रयोग! अगदी कमी खर्चात भातरोपाचा प्रयोग
सध्या भातपिकाला हमीभाव मिळत असला तरी त्याच्या खर्चात चांगलीच वाढ झाली आहे. यात बचत करण्यासाठी शेतकरी शिवराम चव्हाण यांनी यंदा एक अनोखा प्रयोग केला. हा प्रयोग नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा!
सिंधुदुर्ग कातवड (ता. मालवण) येथील तरूण शेतकरी शिवराम गोविंद चव्हाण यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी भात पेरणीपूर्वी होणारी मशागत, त्यानंतर नांगरणी, पेरणी आदींसाठी होणारा खर्च टाळून प्लास्टिक कंटेनरमध्ये भातरोप निर्मितीचा वेगळा प्रयोग केलाय.
नुकतीच त्यांनी प्लास्टिक कंटेनरमध्ये झालेल्या भात रोपांची रोवणीही पूर्ण केली आहे. त्यांना या अनोख्या प्रयोगातून भाताचे चांगले उत्पादनही निघण्याचा विश्वास आहे.
सर्वसाधारणपणे जिल्ह्यात भात पेरणीपूर्वी जमिनीची मशागत होते. या दरम्यान झाडांच्या फांद्या जाळून जमीन भाजली जाते. पाऊस पडला कि, जमिनीची नांगरणी करून भात पेरणी होत असते. मग रूजलेली भातरोपे काढून पुन्हा लावणीची कामे होतात. मात्र यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. यंदा या सर्व प्रक्रियेला फाटा देत चव्हाण यांनी कंटेनरमध्ये भातरोप निर्मितीचा प्रयोग केला आहे.
चव्हाण यांची आंब्याची बाग देखील आहे. यात बागेतील आंबे काढणे तसेच ने-आण करण्यासाठी त्यांनी प्लास्टिकचे ५० कंटेनर विकत घेतले होते. याच कंटेनरमध्ये त्यांनी भात रोपवाटिका तयार केली आहे. ही भात रोपवाटिका तयार करताना, प्रामुख्याने दोन भागात माती आणि उर्वरीत भागात शेणखत भरले आहे. त्यावर त्यांनी भात बियाण्याची पेरणी केली. हा प्रयोग करत असताना चव्हाण यांना तालुका कृषी अधिकारी गोसावी आणि कृषी सहायक धनंजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
एका कंटेनरमध्ये ७० ग्रॅम या प्रमाणात चव्हाण यांनी भात बियाणे पेरले आहे. एका गुंठ्यामागे एक कंटेनर यानुसार ५० कंटेनरमध्ये भात रोप निर्मिती केली गेली आहे. पेरणीच्या २५ दिवसांनी या कंटेनरमधील भात रोपांची ‘श्री’ पद्धतीने लागवड केली आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये चव्हाण यांचा भातपेरणी पूर्वी होणाऱ्या मशागतीचा खर्च वाचला आहे. त्याचप्रमाणे तरवा काढण्यासाठीही मनुष्यबळाची गरज लागली नाही.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे कंटेनरमध्ये भात रोप निर्मिती झाल्याने भातरोपांमध्ये तण उगवलेले नाही. पावसावरचे अवलंबित्व कमी झाले, एकसमान रोपनिर्मिती झाली. मुख्य म्हणजे वेळेतही मोठी बचत झाली. कंटेनरमधील रोप निर्मितीमुळे भात बियाणे देखील कमी प्रमाणात लागले. मुबलक पाणी आणि सेंद्रीय खते देता आल्याने भाताची वाढ देखील चांगली झाल्याचेही चव्हाण म्हणाले.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup