पुढील दोन-तीन दिवस स्वेटर नाही रेनकोट घाला; राज्यात या ठिकाणी कोसळणार पाऊस
राज्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून अचानक वातावरणात मोठे बदल झाले असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील थंडी आधीपेक्षा कमी झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये अचानक गारवा कमी झाल्याने वातावरणात मोठे बदल झाला आहे. एवढेच नव्हे तर दोन दिवसांपासून राज्यातील उन्हाचा तडाका देखील वाढला आहे. सकाळी धुके, दुपारी उन्हाचा तडाखा तर सध्याकाळी दमट वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. या सर्व वातावरण बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. एवढेच नव्हेच तर काल गोवा, कोकणासह, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. या जिल्ह्यात आज देखील ढगाळ वातावरण राहणार असून या भागात आज देखील पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी अधिक होत असून विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 9.3 अंश सेल्सिअस, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील बहुतांशी ठिकाणी पारा 11 ते 24 अंशांच्या दरम्यान आहे.