जाणून घ्या सेंद्रिय कर्बचे होणारे अनुकूल परिणाम
हल्ली शेतकऱ्यांचा जैविक शेतीचा कल वाढत चालला आहे. आजच्या लेखात आपण सेंद्रिय कर्बचे होणारे अनुकूल परिणाम काय आहेत? यावर माहिती करून घेणार आहोत…
भौतिक परिणाम : सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकण मातीशी संयोग पावल्याने चिकणमाती ह्युमस संयुक्त पदार्थ तयार होत असतो. दरम्यान ह्युमसची सेंद्रिय कर्बाच्या अवस्थेतील उपलब्धतेने भौतिक अनुकूल प्रभाव पडतो. तसेच जमिनीची घनता कमी करून मातीच्या कणा-कणातील पोकळी वाढवून हवा खेळती ठेवली जाते. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मुरण्याची अवस्था आणि निचऱ्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप थांबून जलवाहक शक्ती वाढते.
रासायनिक परिणाम : विविध पिकांचा विचार केला तर अवशेषातील कर्ब-नत्र गुणेत्तोर प्रमाण ४०.१ ते ९०.१ पर्यंतच असते. तसेच ह्युमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण ५.० ते ५.५ टक्के आणि कर्बाचे प्रमाण ५० ते ५८ टक्के एवढे सते. सुपीक जमिनीतील ह्युमसचा कर्ब नत्र ९ः१ ते १२ः१ च्या दरम्यान आढळतो. लक्षात घ्या, गुणोत्तराचे प्रमाण जेवढे अधिक तेवढा सेंद्रिय खत कुजण्यास अधिक वेळ लागतो. साधारणतः १३ः१ ते १६ः१ कर्ब-नत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरते. त्याचा परिणाम खालील बाबींवर होत असतो.
रासायनिक द्रव्यांच्या उपलब्धतेत वाढ :
- नत्र आणि स्फुरद यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
- रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
- स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावून उपलब्धता वाढते.
- फल्विक आम्ल आणि अन्य ह्युमिक पदार्थांमुळे रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पदार्थांचा ऱ्हास अथवा स्थिरीकरण न होता विद्राव्य स्वरुपात ते पिकांना सहज उपलब्ध होते.
- जमिनाचा सामू उदासीन (६.० ते ७.०) ठेवण्यास देखील मदत होते.
- आयन विनिमय क्षमता देखील वाढते.
- चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता देखील कमी होते.
जैविक परिणाम : सेंद्रिय कार्बनमुळे सूक्ष्मजीवांच्या उत्पादन क्रियेस गती मिळून त्यांच्या संख्येत वाढ होते. तसेच विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धेवर सकारात्मक परिणाम होतो. मात्र सेंद्रिय निविष्ठांचा वापर करताना आपल्याकडील शेणखत चांगल्या प्रतिचे कसे राहील? याकडे लक्ष द्या. जेथे पाऊस पडतो तेथे ढीग पद्धतीने खत तयार करा. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करा. सेंद्रिय खत चांगले कुजवा. अन्यथा शेणखतातील तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup