Krushidoot : शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, दिवाळीपूर्वीच खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत!
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात वाहून गेले आहे. ऐन दिवाळीच्या सणावर बळीराजा हताश झाला आहे. पण आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारी गूड न्यूज अखेर कृषिमंत्री दादा भुसेंनी (dada bhuse) दिली आहे. ‘3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
जालना (jalana) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना निधी वाटप केल्याबद्दलची माहिती दिली.
शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असून अतिवृष्टीमुळे जून महिन्यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे, असं भुसे यांनी सांगितलं.
‘जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत सामूहिक शेततळ्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असुन येणाऱ्या काळात सामूहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अस्तरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचंही दादा भुसे यांनी सांगितलं.
‘शेतकऱ्यांना लागवडीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीककर्ज मिळाले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असुन याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.