मी माफी मागतो, हा वाद थांबवा… वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचा जाहीर माफीनामा
मुंबई : महापुरुषांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिलीय.
पाटील पत्रकात म्हंटले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे.
त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाला, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.
मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय, ती ही मागे घ्यावी.
तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असल्याचं त्यांनी पत्रकात म्हंटलंय.
महत्वाच्या बातम्या : जी-20 परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज; परदेशी पाहुण्यांचे फेटे बांधून स्वागत… मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
दरम्यान, औरंगाबादमधील पैठणमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याचे राज्यभर पडसाद उमटत असतानाच पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यावर काही कार्यकर्त्यांकडून शाईफेकीचा प्रकार घडला. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागून हा वाद इथेचं संपवावा, अशी विनंती देखील केलीय.