HSC Board : बारावीच्या परीक्षांसदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांचं टेंशन वाढलं
बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असून बारावीची लेखी परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. परंतु त्याआधीच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं ऎन परीक्षेच्या तोंडावर टेंशन वाढलं असल्याचे सांगण्यात येते आहे.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. परंतु या परीक्षेआधीच विभागीय शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण मिळणार नाहीत, असा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देणे हे बंधनकारक असणार आहे.
2019-20 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षा (बोर्ड परीक्षा) घेण्यात आली नव्हती. तर या वर्षातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्यातील या परीक्षेची भीती नाहीशी व्हावी, परीक्षेला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, लिखाणाचा सराव वाढावा, या हेतूने विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे.
दरम्यान, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेआधीच होम सेंटर पद्धत देखील मंडळाकडून बंद करण्यात आली आहे.