‘या’ योजनेचा लाभ घ्या आणि करा रेशीम शेती!
सध्या शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे शेतीसाठी निसर्गाची साथ नाही आणि आलेल्या मालाला योग्य भाव नाही. ही स्थिती पाहता प्रत्येक शेतकऱ्याने शेती सोबतच काही जोडधंदा सुरू करण्याची गरज आहे. याचसाठी आम्ही आपण करू शकता असा जोडधंदा घेऊन आलो आहोत तो म्हणजे रेशीम शेती…
रेशमी शेती अलीकडे लोकप्रिय झाली असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा आहे. याचा रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरु केले गेले आहे. या संचालनालयाच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वप्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन दिले जाते.
निसर्गात जवळपास पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मिती ही रेशीम अळीच्या कोषापासून होत असते. यापासून निर्माण होणारा रेशीमधागा लोकप्रिय तर आहेच सोबत त्याला मिळणारी किंमतही चांगली असते.
रेशीम शेतीसाठी कोणती अनुदान योजना आहे? :
● जमीन उपलब्ध असणारे शेतकरी तुती लागवड व्यवसाय सुरु करू शकतात.
● तुती लागवड व साहित्याच्या खरेदीसाठी युनिट कॉस्ट म्हणून २० हजार रुपये अनुदान दिले जाते.
● या शेतीसाठी पक्के किटक संगोपन गृह बांधकामासाठी २ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याच्या ५० टक्के म्हणजे एक लाख रुपये रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
● एक एकरपर्यंत ठिबक सिंचनासाठी एकूण खर्चाच्या ७५ टक्के म्हणजे १५ हजार इतकी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
● दरम्यान शेतकऱ्यांना यासाठी केवळ पाच हजार रुपये इतका खर्च करावा लागतो.
● किटक संगोपन साहित्यासाठी अपेक्षित ५० हजार रुपये खर्चापैकी ७५ टक्के म्हणजे ३७ हजार ५०० रुपये रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.
● अनुदानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के तुतीची झाडे जीवंत ठेवणे आवश्यक आहे.
● पहिल्या वर्षी ५० किलो, दुसऱ्या वर्षी १०० किलो, तिसऱ्या वर्षी २०० किलो प्रति एकर कोष उत्पादन काढणे अनिवार्य आहे.
असे करा रेशीम शेतीचे नियोजन:
● पहिले वर्ष – जून ते जुलै दरम्यान १ एकरात तुती लागवड केल्यास डिसेंबरमध्ये पहिले पिक येते.
● दुसरे वर्ष – मे ते जून दरम्यान तुतीची तळ छाटणी करुन जुलै ते ऑगष्ट दरम्यान पहिले पिक घेता येते.
● ऑक्टोंबरमध्ये दुसरे व जानेवारीमध्ये तिसरे व मार्च ते एप्रिल दरम्यान चौथे पिक घेता येते.
● दुसऱ्या वर्षी चारही पिके मिळून ५०० किलो कोष उत्पादन घेता येते.
● वर्षातून चार ते पाच पीके घेत शेती केल्यास केवळ एक एकर तुती लागवडीतून ५० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.
● मोठे नियोजन केल्यास एकरी ५० हजार प्रती पिक या प्रमाणे उत्पन्न वाढत जाते.
● तुतीची लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, संगोपन साहित्य यासाठी केवळ पहिल्याच वर्षी खर्च येतो. त्यानंतर पुढील १० वर्षापर्यंत खर्च करण्याची गरज नसते.
● तुतीच्या झाडांच्या फांद्या, किटकांची विष्ठा याद्वारे चांगले सेंद्रीय खत मिळते.
● तुतीचा पाला प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे शिल्लक पाला जनावरांना उत्तम खाद्य म्हणून वापरू शकता.
रेशीम शेतीसाठी ‘या’ सवलती आहेत! :
● शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बेणे पुरवठा करण्यात येतो. त
● विद्या वेतनासह रेशीम शेतीचे प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन व सवलतीच्या दरात अंडीपुंजांचा पुरवठाही केला जातो.
● शेतकरी गटामध्ये अथवा समुहामध्येही ५० ते १०० एकर पर्यंत तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादन घेत सहकारी संस्था स्थापन करुन प्रक्रिया उद्योग देखील सुरु करता येतो.
● महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेशीम अळ्याचे संगोपन करण्यासाठी महिला वर्ग पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे.
अनुदानासाठी आवश्यक बाबी :
● किटक संगोपनगृह बांधकाम, ठिबक सिंचन संच व इतर अनुदानासाठी शेतकऱ्यांना ७/१२ आठ अ, गाव नमुना, तुती लागवडीच्या अद्ययावत नोंदी नमूद करून घ्या.
● पक्के किटक संगोपनगृह बांधकाम नियोजन व अंदाजपत्रक तयार करा. त्याची मान्यता अभियंत्यांकडून सादर करून घ्या.
● बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, संगोपनगृह बांधकामाचा दाखला, संगोपनगृह बांधकाम व ठिबक सिंचन बसविल्याचा दाखला, सात वर्ष कोष उत्पादन कार्यक्रम सुरु ठेवण्याचा करारनामा, लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जातीचा दाखला जोडा.
● शासनाकडून अनुदानासह सर्व प्रकारचे तांत्रिक व प्रत्यक्ष मार्गदर्शन जिल्हा रेशीम संचालनालय व कृषी विज्ञान केंद्रे यांच्यावतीने वेळोवेळी पुरविले जाते.
● कृषी विज्ञान केंद्रांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जातात.
वरील सर्व विचार करता रेशीम शेती हा एक उत्तम जोडधंदा असल्याने या शेतीकडे सकारात्मक भावने पहा.
———————————————————–
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/
———————————————————–