पंतप्रधान मोदींनी कौतूक केलेल्या ‘या’ गावाबद्दल जाणून घ्या!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’ च्या कार्यक्रमात झारखंडमधील एका गावाचे कौतुक केले होते. त्यामुळे देवरी हे गाव प्रकाशझोतात आले आहे. ‘अॅलोवेरा व्हिलेज’ या टोपणनावाने ओळखले जाणारे हे गाव रांचीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. चला, तर या गावाची खासियत जाणून घेऊयात…
पंतप्रधानांनी देवरी गावातील कोरफडीच्या शेतीचे उदाहरण दिले. रांचीजवळील देवरी गावातील महिलांनी मंजू कच्छप जी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून कोरफड लागवडीचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी कोरफडीची लागवड सुरू केली. आजघडीला या शेतीचा केवळ आरोग्य क्षेत्रात फायदा झाला सोबत महिलांचे उत्पन्नही वाढले.
कोरोना काळातही त्याने चांगले उत्पन्न मिळाले. याचे मुख्य प्रमुख कारण म्हणजे सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या थेट त्यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. त्यांच्याकडे आता सुमारे 40 महिलांची टीम या कामात सहभागी असू कोरफडीची लागवड अनेक एकरांमध्ये केली जात आहे.
डिसेंबर 2018 मध्ये, भारतीय कृषी संशोधन परिषद, ICAR आणि बिरसा कृषी विद्यापीठाने आदिवासी उपयोजने अंतर्गत देवरी गावात सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर कोरफडीच्या लागवडीसाठी या परिसराची निवड करण्यात आली होती. तेव्हापासून या गावाला अॅलोवेरा व्हिलेज म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अवघ्या काही वर्षातच या गावाची देशपातळीवर चर्चा होऊ लागली आहे.
कोरफडच्या शेतीसाठी उन्हाळ्यात काही दिवसांच्या अंतराने सिंचन आवश्यक असते. मात्र इतर हंगामात पाण्याची विशेष गरज भासत नाही. याच्या लागवडीसाठी इतर कोणताही विशेष खर्च होत नाही. बाजारात कोरफडीची रोपं सहज उपलब्ध असतात.
कोरफडीत अनेक औषधी गुण असल्यामुळे कावीळसह इतर अनेक आजारांवर त्याचा वापर केला जातो. याशिवाय सौंदर्यप्रसाधने, फेस वॉशसह अनेक इतर कामांमध्ये कोरफड वापरली जाते. सध्या तर मोठ्या शहरांतील लोक कोरफडीचा वापर पेय म्हणून देखील करू लागले आहेत.