फर्टिगेशन : अधिक लाभदायक व कार्यक्षम पद्धत
महाराष्ट्र ठिबक सिंचनात आघाडीवर असून यातून पिकांना खते पुरविल्यास फर्टिगेशन हे शेतीसाठी वरदानच आहे. चला तर आज याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
फर्टिगेशन पद्धतची सुरुवात 1960 मध्ये इस्राएलमध्ये झाली. त्यानंतर अरस्कॉट यांनी 1970 मध्ये पहिला अहवाल सादर केला. ज्यात हातांनी टाकण्याच्या पद्धतीपेक्षा सिंचनातून टाकलेल्या युरियाची पध्दत अधिक लाभदायक व कार्यक्षम असल्याचे आढळून आले.
आधुनिक शेती पध्दतीबद्दल बोलायचे झाले तर यात पाणी व खताची बचत करून थेंबा-थेंबान, सुक्ष्म धारेने द्रवरूप/घनरूप खतामधील पोषक अन्नद्रव्ये पिकाला पुरवली जातात. विशेषतः फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फळ धारणाच्या वेळी, त्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची अधिक मात्रा हवी असते अशावेळी फर्टिगेशनद्वारे दिलेली खते अतिशय उपयोगी पडतात.
पिकाला नेहमी योग्य त्यावेळी संतुलित प्रमाणात पाण्याद्वारे विद्राव्य खते देणे आवश्यक असते, ज्यामुळे अन्नद्रव्यांची पूर्तता करता येते, पाण्याची व खताची बचत होते, तसेच पिकाला गरजेनुसार खत पाणी मिळाल्यामुळे पिकाची उगवण शक्ती पाठोपाठ पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढते. हे सर्व साध्य करण्यासाठी फर्टिगेशन प्रक्रिया अतिशय लाभदायक ठरते.
फर्टिगेशन म्हणजे नक्की काय? : पिकाच्या मुळाशी गरजेनुसार ठिबक सिंचनातून योग्य अन्नद्रव्ये खते व पाणी एकत्रितपणे देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन म्हटले जाते.
● फर्टिगेशन तंत्रामुळे पिकांची पाणी, खत वापर क्षमता ही 40-50% वाढते.
● जमिनीची सुपीकता वाढून पिकाची रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते .
इरिगेशन खत पद्धत : यात ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग करून खते वापरली जातात. यात विशेषतः खताची टाकी, व्हेंच्युरी, पंप आदींचा उपयोग होतो.
खताची टाकी : यामध्ये खतांचे मिश्रण असून ते मूख्य पाईपलाईनला जोडलेली असतात. तसेच इररिगेशनचे पाणी टाकीमधील खताला पूर्णपणे विरघळून टाकतात. त्यानंतर सदर मिश्रण ठिबकच्या नळीद्वारे पिकाला पुरवली जातात.
व्हेंच्युरी : हे उपकरण कमी खर्चाचे असून कमी जागेसाठी सोईस्कर आहे. यात पाईपमध्ये दबाव निर्माण करून त्या ठिकाणी खताच्या मिश्रनाला व इरिगेशनच्या पाण्याला ओढून ते तीव्र गतीने पाईपकडे सोडण्यात येते.
पंप : याद्वारे खताचा व पाण्याचा प्रवाह हा संतुलित करता येतो.
इरिगेशन फिल्टर : हे फिल्टर मुख्य पाईपलाईनला लावल्यास अशुद्ध पाणी देखील शुद्ध होते. त्यामुळे नळ्यामध्ये घाण साचत नाही, पाण्याचा प्रवाह देखील थांबत नाही .
● उत्पादनात २५-३०% वाढ होते.
● द्रवरूप किंवा घनरूप खते सिंचनातून वापरल्याने ती अधिक फायदेशीर, उपयुक्त व कार्यक्षम ठरतात आणि अवक्षेपणमुक्त असल्यामुळे ड्रीपर्स बंद होण्याची भीती नसते.
● पिकांच्या मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही.
● मूख्य पोषणद्रव्याचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो.
● पोषण द्रव्याचा ऱ्हास होत नाही.
● मजूर, यंत्रसामग्री म्हणजे आर्थिक बचत होते.
● खतवापर, पाणीवापर कार्यक्षमता व जमिनीचा सुपीकता वाढते व रोगांना बळी पडण्याचे प्रमाण थांबते.
फर्टिगेशन करतांना ही दक्षता घ्या :
● ठिबक तोट्या/ ड्रीपर्स मुख्य पाईपलाईनला योग्य रीतीने जोडा.
● ठिबक तोट्या/ ड्रीपर्स यामध्ये माती किंवा पालापाचोळा जाणार नाही याची काळजी घ्या.
● पिकाला नळ्यांचा त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवा.
● ठिबक /सूक्ष्म सिंचन संचामध्ये खत शेवाळे, गंधक, लोह किंवा इतर क्षार साचू देऊ नका.
● शेवाळ असल्यास क्लोरीन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आम्ल प्रक्रिया करा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/