भारतातील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका; WHO चा इशारा
बदलत्या वातावरणात किंवा थंडीत लहान मुलांना खूप सहज व लवकर सर्दी-खोकला होतो हे आपल्या पैकी सर्वांचं माहिती आहे. खोकला हा असा आजार आहे जो सामान्य जरी वाटत असला तरी खूप हैराण करू शकतो. जास्त करून लहान मुलांना खोकला लगेच जडावतो. जर हा खोकला स्वत:हून 1-2 दिवसांत कमी झाला तर चिंतेचे कारण नसते. पण जर खोकला वाढत राहिला तर मात्र गंभीर समस्या निर्माण होऊ सकते. असचं काही प्रकार काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तान येथे घडला आहे.. परंतु या घटनेनंतर WHO (World Health Organization) ने गंभीर इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल 19 लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे ही घटना घडली, असा दावा करण्यात येत आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे.
मूळच्या उत्तर प्रदेशच्या मारयॉन बायोटेक कंपनीकडून Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन घेतले जाते. याच दोन कफ सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे वरील दोन कफ सिरप देऊ नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, मुलांना 2 ते 7 दिवस हे औषध दिवसातून3 ते 4 वेळा देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली होती.