डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा मोहीम सुरु!
केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रात डिजिटल प्रणाली वाढवण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहे. कारभारात नियमितता आणि योजनांचा थेट लाभ मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे.
त्याच अनुषंगाने विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या समोर डिजिटल प्रणाली आणली जातेय. त्याचाच नमुना म्हणून डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम राज्यसरकारच्यावतीने सुरु करण्यात आलीय. त्यामुळे आता गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी हा डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचे वाटप गावस्तरावर ग्रामसभांमध्ये होणार आहे.
शेती व्यवसयात अमूलाग्र बदल सुरु आहेत. राज्य आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्नशील असून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. जेणेकरून डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांना समजेल. लवकरच ग्रामसभांमधून शेतकऱ्यांच्या खाते उताऱ्याचे वाचन होईल. वर्षभर मंजूर विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती ही ग्रामसभेला द्यावी लागेल. डिजिटल सातबारे देण्यास सरकारने यापुर्वीच परवानगी दिली आहे. सध्या या मोहिमेला राज्यात सुरवात करण्यात आलीय.