Breaking news : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा
संपूर्ण राज्यभरात आज सकाळपासूनच बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. या संपाच्या प्रभाव राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासूनच दिसू लागला आहे. राज्यातील अनेक भागातील बत्तीगुल झाली आहे. येणाऱ्या 72 तासात विजेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांना भेडसावत होती.
परंतु आता चिंता करण्याची गरज नाही.. कारण काही वेळा पूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटनांमध्ये चर्चा पार पडली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला असून वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी संबोधित करताना म्हटले की, राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही. येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अदानी समूहाने समांतर परवान्यासाठी अर्ज असल्याचे या वेळी फडणवीस म्हणाले..
एवढेच नव्हे तर राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी म्हटले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, आजच संप महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी पुकारण्यात आला होता, असे वीज कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले. तरआज सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आमचे समाधान झाले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाने, आश्वासनामुळे आमचे समाधान झाले असल्याचे वीज कर्मचारी संघटनांनी सांगितले.