ग्रामीण रोजगाराचा नवा पर्याय ‘कृषी पर्यटन’
कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा लोकांना गावाचे महत्व कळाले आहे. मात्र गावातील तरूणांना गावातच रोजगार मिळेल का? काही पर्याय आहे का? या विषयी प्रश्न पडले आहेत. खास गावातील अशा तरूणांसाठी अनेक उद्योग व्यवसाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय होय. राज्यात दरवर्षी मोठ्या संख्यने कृषी पर्यटन केंद्र सुरु होत आहेत. सध्या अनेक कृषी पर्यटन केंद्र यशस्वीपणे सुरु देखील आहेत. चला तर याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
आपल्या शेतात शहरी पर्यटकांना बोलवून शेती तसेच गावाची संस्कृती प्रत्यक्षात दाखवणे म्हणजे कृषी पर्यटन होय. शेती कशी पिकवली जाते? कशी केली जाते? विविध पिके, फळांची माहिती पर्यटकांना सांगणे. याची प्रत्यक्ष माहिती देऊन दुपारी अस्सल गावाराण जेवण देणे. तसेच त्या गावात, शेतात ज्या काही रानभाज्या किंवा स्थानिक भाज्या असेल ते पर्यटकांना खायला देणे.
नंतर संध्याकाळी स्थानिक व पारंपरिक खेळांची माहिती देणे/खेळणे. पर्यटकांना गावदर्शन घडविणे, गावातील प्रसिद्ध गोष्टी सांगणे. थोडक्यात सांगायचे तर पर्यटकांना गाव आणि शेती संस्कृती विषयक माहिती देऊन समृद्ध करणे म्हणजे कृषी पर्यटन.
कृषी पर्यटनासाठी चार महत्वाचे घटक लागतात. ते म्हणजे गाव, शेती, शेतकरी आणि पर्यटक. गावातील दहा तरूण एकत्र आले तर वरिल सर्व घटक सहज मिळू शकतात.
मोक्याच्या परिसरात शेती असेल तर त्या जमीनीचा योग्य उपयोग करून कृषी आणि शेती पर्यटन केले जाऊ शकते. तसेच आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची, खाण्याची, फिरण्याची, सुरक्षेची आणि इतर काही सुविधांसह कृषीरंजन उपक्रमांची सोय करणे गरजेचे असते.
एका कृषी पर्यटन केंद्रात शेती तर केली जाते. सोबत मत्स्य व्यवसाय, कुकूटपालन, शेळी पालन, गोपालन, दुग्ध व्यवसाय, मधनिर्मिती, सेंद्रिय शेती, फलबाग, शेती उत्पादने विक्री केंद्र आणि इतर काही व्यवसाय याअंतर्गत तुम्ही करू शकता. यामुळे पर्यटक तसेच गावही आर्थिक समृद्ध होण्यास सुरुवात होईल.
खरंच कृषी पर्यटन असा शेतीपूरक व्यवसाय आहे ज्यातून शेतीचा आणि गावाचा देखील विकास होतो. एका कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जवळपास २० जणांना रोजगार मिळू शकतो.
———————————————————–
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/
———————————————————–
कृषी पर्यटनाचे असेही फायदे :
● पर्यावरणाचे संतूलन, ग्रामीण व शेती संस्कृतीचे संवर्धन होते.
● गावातील कला, खाद्य संकृती, राहणीमान, बोलीभाषा, पेहराव, जत्रा, यात्रा, उत्सव-महोत्सवांचे परंपरा जतन होते.
● गावाचं गावपण जपले जाते.
कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी सुरूवातीला भांडवल, जागा, ग्राहक आणि मार्केटिंगसाठी मेहनत लागेल. या केंद्राचा पाया रोवायला किमान वर्ष तरी लागू शकते. मात्र लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.